कर्मवीर जयंतीनिमित्त औंध येथील महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
पुणे, महाईन्यूज, प्रतिनिधी
औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भाषण कौशल्याचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. आज जागतिकीकरणात भाषण कौशल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रयत शिक्षण संस्थेचे, संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थी घडवायचा होता. त्यासाठी त्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्ययुक्त शिक्षणाला महत्त्व दिले होते. त्यामुळेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा. अशा हेतूने या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.
कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाने पार पडल्या. वकृत्व स्पर्धेत महाविद्यालयातील ज्युनिअर आणि सीनियर विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रदीप भिसे व प्रा. अविनाश जाधव यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन रवींद्र जाधव याने केले. वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन डॉ. अतुल चौरे यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रा. सायली गोसावी, प्रा. वेदश्री सरोदे आणि प्रा. स्नेहल रेडे उपस्थित होते.