करोनाच्या फेज 3 मध्ये जाण्यापूर्वी कठोर निर्णय घेणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई | महाईन्यूज
सध्या करोनाची परिस्थिती खूपच वाईट होत चालली आहे. आपण सध्या करोनाच्या फेज 2 मध्ये आहोत. फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी सरकार कसोशिने प्रयत्न करत आहे. असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात जगभरात होणारा प्रयत्न यापासून अभ्यास करून पुढील अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केलं आहे.
राजेश टोपे म्हणाले की, “रेल्वेच्या बोग्यांमध्ये जास्तीतजास्त किती माणसं असावेत याबाबत काही मार्गदर्शक सुचना देण्यात येण्याबाबत विचार सुरु आहे. कारण पुढील 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण फेज 2 मध्ये आहोत. त्यामुळे या फेजमध्ये करोनावर नियंत्रणासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. आपण फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या केल्या जातील. औषध कंपन्यांनी जगभरात इतर देशांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्याचीही माहिती दिली आहे. त्याचाही उपयोग केला जाईल.”
औषध कंपन्यांनी मोफत औषधं पुरवण्याची तयारी दाखवली आहे. या कंपन्या जागतिक स्तरावर काम करतात. त्यामुळे त्यांनी काही सुचनाही दिल्या आहेत. ते पूर्णपणे बंदच्या मताचे आहेत. बंद करण्याबाबत दोन भाग आहेत. आवश्यक आणि अनावश्यक. यातील अनावश्यक गोष्टी पूर्णपणे बंद करण्याचा विचार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
या शहरांमध्ये करोनाचे एवढे रुग्ण ?
- पिंपरी चिंचवड – 9
- पुणे – 7
- मुंबई – 6
- नागपूर – 4
- यवतमाळ – 3
- कल्याण – 3
- नवी मुंबई – 3
- रायगड – 1
- ठाणे -1
- अहमदनगर – 1
- औरंगाबाद – 1
- एकूण 39
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू ?
- कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
- दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
- एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू