कपात मागे घेऊन नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करा – राहूल कलाटे
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या मावळातील पवना धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आजुनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न जवळपास मिटलेला आहे. आता शहरातील नागरिकांवर लादलेली पाणी कपात रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केली आहे.
यासंदर्भात कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पवना धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात अपेक्षीत वाढ झाली आहे. 98 टक्के पाणी धरणात उपलब्ध आहे. पुढील वर्षाची चिंता मिटलेली आहे. आता शहरवासियांवर लादलेली पाणी कपात त्वरीत मागे घेण्यात यावी. नागरिकांना दिवसाआड पाणी न देता ते दररोज पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.