महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे – शरद पवार
मुंबई – काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. २१ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोनावर मात केल्यानंतर सातव यांच्या शरीरात ‘सायटोमेगॅलो’ हा नवा विषाणू आढळला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
सातव यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती’, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ‘गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’, अशा शब्दांत शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. pic.twitter.com/P7DaIRw3tw
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2021
दरम्यान, दरम्यान, राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जात असत. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड करण्यात आली होती. अनेकदा राज्यातील बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत करून 2014 साली हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. हिंगोलीच्या खासदारपदी असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, रेल्वे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये ते सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी ट्विट करून त्यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती, तसेच आपल्या संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.