उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पदच, राम मंदिरावर भाजपाचा पेटंट नाही: उमा भारती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आङे. ‘राम मंदिरावर भाजपाचा पेटंट नाही. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि अकाली दलासह अन्य पक्षांनीही साथ द्यावी’, असे विधान त्यांनी केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा अयोध्या दौरा केला होता. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दिले होते. या पार्श्वभूमीवर उमा भारती या होशंगाबाद येथे रविवारी प्रचारसभेसाठी आल्या होत्या. त्यांना उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, अकाली दल, ओवेसी, आझम खान या सर्वांनीही पुढे येऊन राम मंदिराच्या उभारणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
‘अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. हा प्रश्न भावनेशी निगडित आहे. त्यामुळे रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी केंद्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करणे अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत कठीण होते. परंतु आता केंद्रात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे कायदा करा किंवा अध्यादेश काढा, शिवसेना पाठिंबा देईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.