उच्च न्यायालयाचा आदेश, राज्यातील ८३३ सहायक आरटीओंची निवड रद्द
मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून वर्षभरापूर्वी घेतलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा भोंगळ कारभार या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा ठरला आहे.
राज्याच्या परिवहन विभागामध्ये एकूण ५,१०० पदांमधून २,२५६ पदे रिक्त आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर ८६७ पदांपैकी ३७३ पदे रिक्त आहेत, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर १३०२ पदांपैकी १००८ पदे रिक्त आहेत. त्यात निवड झालेली ही पदेही रद्द झाल्याने कामाचा वाढता ताण कसा पेलायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पदांच्या अनुशेषावरून कर्मचाऱ्यांत नाराजी
राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. त्यातच निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मात्र पदांचा अनुशेष असताना ही कामे कशी करायची, यावरुन विभागामध्ये प्रचंड नाराजी आहे.