ई पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासालाही सुरुवात होणार
मुंबई – राज्यांर्तंत प्रवासासाठी ई पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला देखील सुरुवात होणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या एका पत्रामधून ही गोष्ट उघड झाली आहे. त्यासाठी उद्यापासून रेल्वेचे बुकिंग सुरू केले जाणार आहे. सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यांमध्ये जिल्ह्यांतर्गत रेल्वे प्रवास करण्याला सुरुवात केली जाणार आहे.
राज्यात काल मिशन बिगीन अगेनची नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. त्याला अनुसरून मध्य रेल्वेने उद्यापासून रेल्वेचे आरक्षण देखील सुरू केले आहे. भारतीय रेल्वेवर सध्या ज्या 200 स्पेशल गाड्या धावत आहेत, त्याच गाड्यांमध्ये या नवीन नियमानुसार प्रवास करता येणार आहे. रेल्वे पूर्णतः सुरू करण्यात येणार नाही, या 200 रेल्वे गाड्यांचा सोबत ज्या स्पेशल राजधानी एक्सप्रेस चालवल्या जात आहेत त्यामध्ये देखील प्रवास करता येणार आहे.