आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामस्थांचे राज्य सरकारकडे मागणी, पर्यटकांची सोय करण्यासाठी सुविधा हव्यात
अहमदनगर | महाईन्यूज
दिवसेंदिवस वाढत चाललेली पर्यटक संख्या लक्षात घेता गावाची माहिती देण्यासाठी कमीत कमी ५ व्यक्तींची आवश्यकता आहे. अनेकदा एकाच वेळी जास्त सहली आल्यास प्रत्येकाला माहिती देण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती देणे शक्य होत नाही. त्यातूनच वाद निर्माण होतात. येणाऱ्या सहलींना गाव पातळीवर माहिती देणे व सुविधा पुरविणे ग्रामस्थांना आता शक्य होत नाही.
शासनस्तरावरून किंवा विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून येणाऱ्या लोकांसाठी मूलभूत सुविधा, मार्गदर्शकाच्या मानधनाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी आदर्शगाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील ग्रामसभेत करण्यात आली आहे.
अध्यक्षस्थानी सरपंच पोपटराव पवार हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, सुखदेव सोळंकी आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.