प्रार्थनास्थळं सुरू करा! ; आता रामदास आठवले आंदोलन छेडणार
मुंबई| राज्यभरातील प्रार्थनास्थळं सुरू करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता याच मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आहे.
दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मंदिर, मस्जिद, चर्च, देरासर, गुरुद्वारा, बुद्ध विहार अशा सर्व धर्मियांची धार्मिक स्थळं ८ सप्टेंबरपर्यंत खोलण्यात यावीत. कोरोना संकटासंबंधित नियमांचं पालन व्हावं यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आठवड्याभरात धार्मिक स्थळं सुरू करण्यात येतील, असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
तर आज MIM चे खासदार एम्तियाज जलील हे राज्यातील मंदिरे आणि मशिद उघडण्याच्या मागणीसाठी चांगलेचं आक्रमक झाले आहेत.आज (2 सप्टेंबर) ला औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. जलील यांच्या या घोषणेमुळे आज पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जलील आज दुपारी शहागंज येथील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.