आजपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी
मुंबई| मागील ५ महिन्यांपासून बंद असलेली राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा बुधवारपासून म्हणजे आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रवासासाठी बुधवारपासून बुकिंग सुरू करण्यात आलं असून, या सेवेमुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारनं ई-पासाची अट रद्द केल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
याबाबत राज्य सरकारला कळवण्यात आलं असून, बुधवार २ सप्टेंबरपासून रेल्वेचं बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. बुकिंग सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनं एक पत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात ‘सरकारनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्यानं रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करत आहोत. त्यासाठी प्रवासी आरक्षण सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचं बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता येईल’, असं नमूद करण्यात आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे ई-पासची अट रद्द करताना खासगी बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. २ सप्टेंबरपासून ही नियमावली लागू करण्यात आली आहे. यामुळं जिल्हाबंदीतून नागरिकांची सुटका झाली असून हा फार मोठा दिलासा ठरला आहे.