अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचे म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देतोय असं मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवारांनी म्हटलं की, “मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये”. तसेच, अशा परिस्थितीत कारवाई केल्याने शंका उपस्थित करण्यात आली.
कंगणाच्या कार्यालयातील बांधकाम कारवाईबाबत फारशी माहिती नसल्याचं शरद पवार म्हणाले. परंतु, मुंबईत बेकायदेशीर बांधकामं नवी गोष्ट नाही, असं ते म्हणाले. पण सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला आपण संधी देतो. पण, महापालिकेची काही नियमावली आहे, अधिकार्यांना योग्य वाटलं असेल त्यामुळे त्यांनी काही केलं असेल, असं शरद पवार म्हणाले.