उत्तरप्रदेशचे चार माजी मुख्यमंत्री अखेर सोडणार घरे
लखनौ – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उत्तरप्रदेशचे चार माजी मुख्यमंत्री आपली सरकारी निवासस्थाने सोडण्याच्या तयारीला लागले आहेत. या आठवड्याच्या अखेर पर्यंत त्यांना घरे खाली करण्याची सुचना करण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण दत्त तिवारी, मुलायमसिंह यादव, कल्याण सिंह, मायावती, राजनाथ सिंह आणि अखिलेश यदव यांनी त्यांचे सरकारी बंगले खाली करण्याच्या नोटीसा जारी केल्या आहेत.
मायावती आणि तिवारी या दोन माजी मुख्यमंत्र्यांना वगळता बाकीच्या चार जणांनी या नोटीशीनुसार घरे खाली करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मायावती यांनी मात्र आपल्या घराला कांशीराम यांच्या स्मारकाचे स्वरूप दिले आहे. आणि त्यांनी अजून बंगला सोडण्याविषयी काहींही भाष्य केलेले नाही. नारायण दत्त तिवारी यांच्या पत्नीने राज्य सरकारकडे अर्ज करून आपले पती आजारी असल्याने आपल्याला थोडा वेळ मिळावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की आपले पती आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आहेत आणि ते आजारी आहेत त्यामुळे आपल्यावर राज्य सरकारने दया दाखवून थोडी सवलत द्यावी.
मायावतींकडे दोन सरकारी बंगले होते. त्यापैकी 13 ए मॉल ऍव्हेन्यु या निवासस्थानाला त्यांनी कांशीराम स्मारकाचे स्वरूप दिले असले तरी राज्य सरकारने ते अमान्य केले आहे. 6 लालबहादुर शास्त्री मार्ग हे निवासस्थान मायावती यांनी सोडून दिले आहे तथापी त्यांनी ते बेकायदेशीर बळकावले होते. राजनाथसिंह आणि कल्याणसिंह यांनी आपले सामान हलवण्यास सुरूवात केली असून मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनीही आपण ठरलेल्या मुदतीत घर खाली करून देऊ असे म्हटले आहे.