breaking-newsराष्ट्रिय
अवैध उंच इमारतींमध्ये लोक मरत आहेत-सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज अवैध बांधकामांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. अवैध उंच इमारतींमध्ये लोक मरत आहेत, अशी टिप्पणी करताना न्यायालयाने सक्षम यंत्रणांची मंजुरी नसताना उंच इमारती बांधण्याची मोकळीक मिळतेच कशी, असा सवालही केला. ही टिप्पणी करताना न्यायालयाने मुंबईत नुकत्याच एका इमारतीला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचा उल्लेख केला.
दिल्लीतील बवाना कारखाना आणि मुंबईतील कमला मिल्स दुर्घटनांवरही न्यायालयाने बोट ठेवले. कधीतरी नक्कीच बांधकामे नियमित होतील या आशेपोटी सर्रास अनियमित बांधकामे केली जातात, असे न्यायालयाने म्हटले. दिल्लीतील अनधिकृत बांधकामांबाबतच्या सुनावणीवेळी न्यायालयाने देशभरातील अवैध बांधकामांविषयी चिंता व्यक्त केली. आता शहरानुसार सुनावणी घ्यायची का, असा सवालही न्यायालयाने यावेळी केला.