अयोध्येत शिवसेना शाखेचे उदघाटन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. जर राम मंदिर बनणार नसेल तर सरकार बनणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला पत्रकार परिषद घेत दिला. अयोध्येत शिवसेनेनं पहिलं राजकीय पाऊल टाकलं आहे. अयोध्यामध्ये पहिल्या शिवसेना शाखेचे उदघाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदेंसह शिवसेना नेते आणि तेथील स्थानिक नेते उपस्थित होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली.
लवकरच अयोध्या येथे शिवसेना सदस्य नोंदणीची सुरवात होणार आहे. हिंदुत्वाच्या नवीन पर्वाची सुरवात करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते शिवसैनिक, रामभक्तांच्या उपस्थितीत व उत्साहात अयोध्येत येथे शिवसेना शाखेचे उदघाटन झाले. असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबत उदघाटनाचे फोटोही पोस्ट केले आहेत.
शिवसेनेनं ‘चलो अयोध्येचा’ नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कटुंबासह शनिवारी आयोध्येत दाखल झाले होते. अयोध्येतील दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हॉटेलवरुन मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा अदित्य ठाकरे यांच्यासह रामजन्मभूमीच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सहपरिवार त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. केवळ दहा मिनिटांच्या या कालावधीनंतर ते पुन्हा पंचवटी हॉटेलकडे रवाना झाले. हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा सरकारला इशारा दिला. जर राम मंदिर बनणार नसेल तर सरकार बनणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला पत्रकार परिषद घेत दिला. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाण हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.