पिंपरी महापालिकेला पाण्याचा ‘सल्ला’ तब्बल 21 कोटीचा; तरीही पाणी पुरवठ्यांची बोंबाबोंब
पाणी पुरवठ्याच्या अधिका-यांकडून डीआरए कन्स्लटंटची होतेय पाठराखण
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरात 24 बाय 7 योजनेंसह समसमान पाणी पुरवठ्यांची बोंबाबोब सुरु आहे. अमृत योजनेंर्तगत दोन्ही 40 आणि 60 टक्के योजनेला डीआरए कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक आहे. परंतू, या महाशय सल्लागाराने महापालिकेला तब्बल 21 कोटी रुपये सल्ला दिला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने आज (बुधवारी) तिस-या टप्प्यातील 8 कोटी 91 लाख रुपयास मान्यता दिली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा सल्लागार हा दिवसेंदिवस महाग होवू लागल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. पिंपरी चिंचवड शहरात जेएनएनयुआरएम अंतर्गत 40 टक्के आणि 60 टक्के भागासाठी 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेची कामेही सुरू आहेत.
या योजनेतील 60 टक्के भागातील पाणी गळती रोखणे, समसमान पाणी वाटप करणे, तसेच नवीन जलवाहिनी टाकणे, जुने नळजोड नवीन एमडीपीई पाईपने बदलणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन टाक्या उभारणे आदी कामे ईपीसी पद्धतीने शहरातील अनेक भागात सुरू आहेत. हे काम वेगवेगळ्या 4 विभागात 4 ठेकेदारांमार्फत केले जात आहे. दोन कामे अरिहंत कन्स्ट्रक्शन, पी. पी. गोगडे व शिवरत्न कन्स्ट्रक्शन याच्यामार्फत सुरू आहे. हे काम जानेवारी 2018 ला सुरू झाले आहे. आतापर्यंत केवळ 60 टक्के काम पुर्ण झाले आहे.
या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने डीआरए कन्स्लटंट यांची नेमणूक केली आहे. त्या कामाच्या टप्पा एकसाठी त्यांना 8 कोटी 12 लाख 51 हजार, टप्पा दोनच्या कामासाठी 4 कोटी 84 लाख 80 हजार रूपये दिले आहेत. टप्पा एक व दोनच्या कामासाठी सल्लागारास शुल्क देण्यास स्थायी समितीने 18 एप्रिल 2018 ला मंजुरी दिली आहे. तर, टप्पा तीनच्या कामासाठी 8 कोटी 91 लाख रुपये आज सल्लागारास देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
अमृत योजेनचे 60 टक्के काम हे तीन टप्प्यात काम सुरु आहे. या कामास डीआरए कन्सल्टंट यांची नेमणूक केलेली असून डिझाईन, निविदा प्रक्रिया करणे, सरकारची मंजुरी घेणे. काम करुन घेणे. कामाची देखभालीचे काम त्याचे आहे. नळ कनेक्शनचे जिओ टॅगिंग करण्यासह अन्य कामेही ते करीत आहेत. आजपर्यंत 60 टक्के काम पूर्ण झाले असून डीआरए कन्सल्टंट यांना तीन टप्प्यात 21 कोटी रुपये द्यायचे होते. त्यांनी दिलेल्या सल्लामुळे पाणी पुरवठा सुरळीत होवू लागला आहे. असा दावा पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी केला आहे.