अधिकाऱ्याच्या मृत्यूमागे बदल्याचे अर्थकारण; विखेंचा आरोप
अहमदनगर | पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्यूमागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबधच कारणीभूत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी निधन झाले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महसूल विभागावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्हे उपस्थित केले. गायकवाड यांची साताऱ्यातून आठ महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती.
मात्र चारच दिवसात त्यांची पुन्हा पिंपरी चिंचवड येथे अचानक बदली करण्यात आली. त्यामागे असे कोणते कारण घडले? प्रशासनापुढे सध्या करोनाच्या संकटाचे मोठे आव्हान असताना ही बदली शंकास्पद वाटते. राज्य सरकारने सर्व बदल्यांना स्थगिती दिली असतानाही गायकवाड यांची बदली का करण्यात आली, याची चौकशी करावी, अशी मागणी करतानाच या बदल्यांमागे मोठे आर्थिक हितसंबध गुंतले असल्याची चर्चा महसूल विभागातूनच पुढे आली आहे. या बदलीला गायकवाड यांनीच मॅटमध्ये दिलेल्या आव्हानाला स्थगितीही मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर कोणी दबाव आणला का याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असेही विखे- पाटील म्हणाले.