अखेर आजपासून मुंबई मेट्रो रुळावर
मुंबई – लॉकडाऊनमुळे जवळपास सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील मेट्रोसेवा अखेर आज रुळावर आली आहे. सर्व मुंबईकरांसाठी आजपासून घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांना आता नव्या सवयींचे पालन करावे लागेल. मेट्रोच्या वेळापत्रकातही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई मेट्रो सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेतच धावेल. भविष्यात गरज भासल्यास या वेळेत वाढ केली जाईल, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच यापूर्वी मेट्रो एका स्थानकावर 15 ते 20 सेकंद थांबत असे. मात्र आता ट्रेनमधील हवा सतत खेळती ठेवण्यासाठी मेट्रो एका स्थानकावर 30 ते 60 सेकंदांपर्यंत थांबेल. तसेच प्रत्येक मेट्रो स्थानकावर आत आणि बाहेर जाण्यासाठी प्रत्येकी एकच मार्ग खुला राहील. आजपासून दररोज मेट्रोच्या 200 फेऱ्या होतील. सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता प्रत्येक फेरीत 300 जण प्रवास करू शकतात.
त्याचबरोबर प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक दोन तासांनंतर मेट्रोच्या स्थानकांवरील सर्व टचपॉईंट्स सॅनिटाईझ केले जातील. तर मेट्रोच्या प्रत्येक फेरीनंतर ट्रेनही सॅनिटाईझ होईल. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ऍपप्लिकेशन डाऊनलोड करणे बंधनकारक असेल. मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग होईल. तर ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक असेल. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत मेट्रोच्या तिकीटासाठी प्लॅस्टिक टोकन दिले जात होते. परंतु आता कोरोनामुळे ही पद्धत बंद करुन कागदी तिकीट आणि मोबाईल तिकीटचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.