अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही? १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
नवी दिल्ली – कोरोनाचे गंभीर संकट कोसळलेले असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे या याचिकांवर आता १० ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट करण्यात आली होती. तर आजच्या सुनावणीत महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत.
आज झालेल्या सुनावणीत विद्यार्थ्यांच्या वतीने अॅड. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, यूजीसीचे आदेश काळजीपूर्वक केले गेले नाहीत. कोरोनाचा वाढता आकडा आणि संसर्गाचा धोका अशा स्थितीत विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची प्रत नोंदवण्यास सांगितले आहे.