मोदी विरूद्ध संपूूर्ण देश असे पुढील निवडणुकीचे स्वरूप – कॉंग्रेस
कोलकता – पुढील लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध संपूूर्ण देश असे स्वरूप प्राप्त होईल. मोदी सरकार जनताविरोधी आहे. त्या सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी देशातील जनता आतूर आहे, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे नवे प्रभारी असणारे गोगोई येथे पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेस आणि समाजाची मुल्ये सारखीच आहेत. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून कॉंग्रेस केंद्रात सत्तेवर येईल. कमबॅक हा आमच्या पक्षाच्या डीएनएमध्येच आहे. मोदींचा सामना कोण करेल असा सवाल भाजपकडून केला जातो. त्यावर देशाची जनता असे माझे उत्तर आहे.
शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, उद्योजक असे सगळेच घटक मोदी सरकारवर नाराज आहेत. त्या सरकारविरोधात जनता लढेल आणि भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पराभव करेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस सरकारच्या विरोधात काही बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि तृणमूलमध्ये हातमिळवणी होईल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर आताच काही बोलणे घाईचे ठरेल, असे त्रोटक उत्तर गोगोई यांनी दिले.