देशात कसलही वारं आलं, तरी बारामतीत पवार यांचीच हवा… सुप्रिया सुळे
बारामती – भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले आहेत. हेच पैसे जर जनतेसाठी वापरले असते, तर त्यांचं भलं झालं असतं, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर ताशेरे ओढले. देशात आणि राज्यात कसलही वारं आलं, तरी बारामतीत पवारच येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव आदी गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या की, स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी मोदी सरकारने करोडो रुपये खर्च केले. त्यामुळं अशा उधळपट्टीला आळा घालण्यासाठी नवीन लोकसभेत विधेयक मांडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. आजपर्यंत कोणाचीही हवा आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते… असं सांगत त्यांनी कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल, आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू, असंही त्यांनी म्हटलंय.