कचरा निविदा प्रक्रियेत हात बरबटले, आयुक्तांना बेड्या ठोकणार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कच-याची निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर दर कमी केल्याने पुन्हा त्याच कंपन्यांना काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यात आयुक्तांसह पदाधिका-यांचे हात ओले झाले आहेत. न्यायालयात सर्व कागदपत्र सादर करणार असून यात दोषी आढळणा-या आयुक्तांना बेड्या ठोकल्याशिवाय शांत राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.
महापालिकेने शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी दोनच ठेकेदारांना काम देण्याची पहिली निविदा काढली. त्यामध्ये शहराच्या एका भागासाठी बी.व्ही.जी. कंपनी व दुस-या भागासाठी मे. ए.जी. इनव्हायरो इंफ्रा कंपनीस काम मिळालेले आहे. या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने स्थायी समितीच्या बदललेल्या पदाधिका-यांनी हे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा हवाला देत फेरनिविदा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाकडून फेरनिविदा काढली असताना अचानक स्थायी समितीने आधीच्याच दोन ठेकेदारांना हे काम देण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे सर्वसाधारण सभेत निविदाप्रक्रियेच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. हे बाजुला ठेवून पुन्हा त्याच ठेकेदारांना दर कमी केल्याने हे काम देण्याचा निर्णय घेतला जात आहे. या सगळ्यामुळे कच-याच्या निविदाप्रक्रियेत आणखी संशय निर्माण झाला आहे. त्यात आरोपांची खैरात वाढली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी थेट आयुक्त व भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. फेरनिविदा काढण्यासाठी झालेला खर्च आयुक्तांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. निविदाप्रक्रियेच्या अटी-शर्तीत प्रशासनाने मोठे बदल केले आहेत. हे बदल कशासाठी व कोणासाठी केले? हा संशय असल्याचे साने यांनी म्हटले आहे.
कचरा निविदेप्रकरणी राष्ट्रवादीने न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे संपुर्ण माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. न्यायालयामार्फत कायदेशीर पध्दतीने प्रशासन व सत्ताधा-यांचा भ्रष्ट कारभार थांबविला जाईल, असे साने यांनी सांगितले आहे. तर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी गैरव्यवहाराचा आरोप करत हे काम पूर्ण निविदाप्रक्रिया राबवूनच द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच, त्याच ठेकेदारांना पुन्हा ठेका देणे, म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.