आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बूथ स्तरावर प्रत्येकाने कामाला लागावे ः रावसाहेब दानवे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. शिवसेना-भाजप युती झाली तर सेनेला सुटणा-या मतदार संघात आपण सेनेचे काम करू. परंतु, युती न होता स्वबळावर निवडणूक लढविण्याची वेळ आली तर आपली दमछाक व्हायला नको. यासाठी बूथ स्तरावरील प्रत्येकाने जोमाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आढावा बैठकीत केले.
राज्यातील लोकसभा मतदार संघातील भाजपच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रावसाहेब दानवे राज्यभरात दौरा करत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात जाऊन तेथील भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आहेत. आज शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी थरमॅक्स चौकातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उमा खापरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, पक्ष प्रवक्ते अमोल थोरात आदी यावेळी उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, राज्यभरातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघनिहाय 92 हजार बुथ आहे. 88 बुथ प्रमुखांची नेमणूक केली आहे. विविध अशा 23 कामांची यादी बुथ प्रमुखांना यापूर्वीच दिलेली आहे. ते कामकाज कशा पध्दतीने चालू आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. जवळपास सर्वच बुथ प्रमुखांनी दिलेले काम वेळेत पूर्ण केले आहे. आता संघटन मजबूत करण्यावर भर देण्याची गरज आहे. युती होईल अथवा न होईल. परंतु, आपण कामाला लागण्याची गरज आहे. युती झालीच तर शिवसेनेला सुटलेल्या मतदार संघात आपण सेनेच्या उमेदवाराचे काम करू. जर, युतीच नाही झाली तर ऐनवेळी आपली तारांबळ होईल. म्हणून तुम्ही आजपासूनच कामाला लागा, अशा सूचना दानवे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्या.