मुंबईत कोरोनाचे शून्य बळी, एकाही मृत्यूची नोंद नाही
मुंबई | ओमिक्रॉन व्हेरिएंटची भीती सर्वांनाच सतावत असली तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काल शनिवारच्या दिवशी मुंबईत एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. मुंबईकरांसाठी ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. शनिवारी मुंबईत कोरोनाने एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्यांदा मुंबईत अशी नोंद झाली आहे.
मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजना आणि मुंबईकरांची साथ यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. तर शनिवारी मुंबईत २५६ कोरोनाचे रुग्ण आढळले. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात असली तरी ओमिक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलंय. दाटीवाटी वस्तीच्या धारावीत कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. संपूर्ण राज्यात शनिवारच्या दिवसात ८०७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ८६९ रुग्ण बरे झाले असून सध्या राज्यात ६४५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात १ लाख ४१ हजार २४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.