राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार का, काय म्हणाले सरकारी वकील?
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा सरकारी पक्षाच्या वकीलांनी कोर्टात केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी सोमवारी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी राणा दाम्पत्य कोर्टात उपस्थित होते. राणा दाम्पत्याने जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात यावी, असा युक्तिवाद वकिलांनी कोर्टात केला.
राणा दाम्पत्य माध्यमांशी बोलले त्याचवेळी त्यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले होते. यामुळे त्यांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करावी. यामुळे या प्रकरणी आणखी सुनावणी घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केला. पण आपल्यावरील आरोप राणा दाम्पत्याने कोर्टात फेटाळून लावले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या आंदोलनावरून मुंबईतील खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला २३ एप्रिलला अटक केली होती. त्यांच्याविरोधात देशद्रोह आणि सौहार्दतेचं उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी कोर्टाने राणा दाम्पत्याला ४ मे रोजी सशर्त जामीन दिला होता. राणा दाम्पत्याने या प्रकरणी माध्यमांशी संवाद साधू नये, असं विशेष कोर्टाचे न्याया राहुल रोकडे यांनी सांगितलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ९ मे रोजी कोर्टात अर्ज केला होता. राणा दाम्पत्याने कोर्टाने घालून दिलेल्या अटींचं उल्लंघ केलं आहे. जामीन मिळताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
कोर्टाने अटी घालून दिल्यानंतर त्याचं पालन करणं हे आरोपींना आवश्यक आहे, असं कोर्टाने सुनावणीवेळी कोर्टाने नमूद केलं. आता या प्रकरणी येत्या २० जुलैला सुनावणी होणार आहे. आम्ही कायद्याचं पालन करणारे आहोत, असं दाम्पत्याच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. यामुळे माध्यमांशी ते हनुमान चालीसा पठणावर बोलले नाहीत. आपल्या हेतुंवर शंका घेऊन होत असलेल्या आरोपांवर ते बोलले. हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. इथे कायद्याचे कुठलेही उल्लंघन झालेले नाही, असं वकील रिझवान मर्चंच म्हणाले.