विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं संजय राऊतांना भोवणार? हक्कभंग दाखल करण्याची भाजपची मागणी
राऊतांच्या या विधानानंतर विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गदारोळ
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरून आज विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याचं बघायला मिळत आहे.
यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. एखाद्याला राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात आपण एकमेकांच्या विरोधात असू शकतो. मात्र, या विधिमंडळाचा अभिमान सभागृहातील सर्वच सदस्यांना आहे. विधिमंडळाला चोर म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, असं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शेलारांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे, आपण कोणत्याही पक्षाचे असतो, तरी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतो. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कोणालाही चोर म्हणण्याचा अधिकार नाही. मी काही वेळापूर्वी यासंदर्भातील बातमी वाचली. खरं तर अशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. राजकीय मतभेद बाजुला ठेऊन हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का? हे सुद्ध तपासण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, INS विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यावधी रूपये गोळा केले. हे पैसे कुठं गेले याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. या प्रकरणाचा तपास याच तपासयंत्रणांकडून सुरू होता. मात्र, सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. अशाप्रकारे या सरकारने तरास यंत्रणांच्या माध्यमातून २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे. तसेच यासंदर्भात मी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. राज्यात सध्या विधिमंडळ नसून ४० जणांचं चोरमंडळ आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.