अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद जाणार की राहणार? आज होणार महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांनंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून भाजपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी एक पत्रक जाहीर करून आपली बाजू मांडली आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांशी चर्चा करुन उद्यापर्यंत निर्णय घेऊ असे काल सांगितले होते. त्यामुळे आज नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वाचा :-केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे- शिवसेना खासदार संजय राऊत
शरद पवार काय म्हणाले…
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर असून त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काल स्पष्ट केले होते. या प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल असेही सांगितले. मुख्यमंत्र्यांशी यावर उद्या चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले. परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली केल्यानंतर त्यानी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत, आयुक्त पदावर असताना नाही, असे शरद पवारांनी सांगितले.
तसेच परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती, असे पवारांनी सुरुवातील स्पष्ट केले. गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांनी केलेले 100 कोटी वसूलीचे आरोप हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाही, असेही ते म्हणाले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे सर्वाधिकार आहेत, त्यांनी योग्य ती चौकशी करावी, असे पवारांनी सांगितले होते.