चर्होलीतील पाणीप्रश्न पेटला; शेकडो संतप्त महिलांचा क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील चर्होली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असूनही महापालिका कृत्रिम पाणीटंचाई करत आहे. याच्या निषेधार्थ माजी नगरसेविका विनया तापकीर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेकडो संतप्त महिलांनी पालिकेच्या ” ई ” क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा नेला.
पाणिपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांमुळे ही समस्या निर्माण होत असून महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी या भागाकरीता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी, बुस्टर पंपाची व्यवस्था करावी, पाण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे, एक दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी, तो पुरेशा दाबाने आणि पुरेश्या प्रमाणात पाणी मिळावयास हवे, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका विनय तापकीर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तापकीर म्हणाल्या कि, समाविष्ट भागास नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळाली आहे. समाविष्ट भागांचा महापालिकेत समावेश करताना नाही-नाही ती प्रलोभने दाखविली, परंतु आज साध्या पिण्याच्या पाण्याची सोयही महापालिका करू शकलेली नाही, त्यामुळे चऱ्होली व परिसरातील नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.