#Waraginestcorona:मालेगावहून औरंगाबादला परतलेले 67 एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त
औरंगाबाद : देशात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्या वर गेला त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पण याच दरम्यान औरंगाबादकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबादमध्ये आज एकाच दिवसात 67 एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. या जवानांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज औरंगाबादमध्ये एकूण 53 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मालेगावहून बंदोबस्ताहून 74 जवान औरंगाबादमध्ये परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या सर्व जवानांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर आज 74 पैकी 67 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त जवानांना घरी सोडण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामध्येच आज 67 कोरोना रुग्ण बरे झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 हजार 75 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी 34 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 334 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
नुकतेच हिंगोली जिल्ह्यात एकूण 84 एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यापैकी एक जण जालन्याचा आहे. उर्वरित जवानांपैकी 34 जण मालेगाव, तर 35 जवान मुंबईत कार्यरत होते. तर इतर हिंगोलीतील आहेत.