#War Against Corona : बांधकाम कामगारांना सरकारकडून मिळणार दोन वेळचे जेवणे; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागणीला यश
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केलेली नाराजी, कामगार आयुक्तांचे सतत टोचलेले कान तसेच बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी घरातच राहून उपोषणाचे उपसलेले हत्यार यांमुळे हजारो बांधकाम कामगारांना आता दोनवेळचे जेवण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या अटल आहार योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड व पुणेसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नागपूर या महानगरांमधील नोंदीत व अनोंदीत अशा सर्व बांधकाम कामगारांना दुपारचे आणि रात्रीचे असे दोनवेळचे जेवण देण्याचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी (दि. १०) दिले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि जयंत शिंदे यांनी बांधकाम कामगारांच्या जेवणासाठी घेतलेल्या कणखर भूमिकेची राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागली. सरकारच्या आदेशामुळे लॉकडाऊनच्या संकटकाळात उपासमारीची वेळ आलेल्या हजारो बांधकाम कामगारांना दोन घास अन्न मिळण्याची सोय झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घरातच ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे देशात लॉकडाऊनची अंमबलवाजणी सुरू झाली. मात्र या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा राहिला. त्यामध्ये बांधकाम कामगारही येतात. मोठ्या शहरांमध्ये बिल्डरांच्या बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे गवंडी, बिगारी व इतर बांधकाम कामगारांना तर कामे बंद झाल्याने रस्त्यावर राहायची वेळ आली. या बांधकाम कामगारांची उपासमार सुरू झाल्याने एक मोठी सामाजिक समस्या निर्माण होऊ पाहत होती. त्यामुळे या बांधकाम कामगारांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करावी म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे पत्र पाठविले. केंद्र सरकारने बांधकाम कामगारांना एकवेळचे जेवण देण्यासाठी अटल आहार योजना सुरू केली आहे. बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी किंवा कामगार नाक्यावर अवघ्या ५ रुपयांत जेवण देण्याची ही मध्यान्ह भोजन योजना आहे.
लॉकडाऊनच्या काळात ही योजना बांधकाम कामगारांना अन्नपूर्णा योजना ठरणे अपेक्षित होते. मात्र कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे ही मध्यान्ह भोजन योजना बंद पडली. अधिकाऱ्यांनीच ही योजना बासनात गुंडाळल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रातून नाराजी व्यक्त केली होती. तसेच कामगार आयुक्तांना बोलावून बांधकाम कामगारांची सामाजिक सुरक्षा, त्यांचे संरक्षण आणि त्यांना जेवण देण्याची जबाबदारी असताना कामगार आयुक्त कार्यालय एकही जबाबदारी पार पाडत नसल्याने अक्षरशः झापले होते. तसेच मध्यान्ह भोजन योजनेसोबतच बांधकाम कामगारांना रात्रीचेही जेवण पुरविण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यासंदर्भात सातत्याने आढावा घेत घेत होते.