मच्छिमारांना सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन
मुंबई : मच्छिमारांनी समुद्रात घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने (इंडियन कोस्ट गार्ड्स) विविध विभागांचा सहभाग घेऊन मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली दि. 2 ते 10 जून 2018 या कालावधीत मुंबई-गोवा-मुंबई दरम्यान होणार आहे, अशी माहिती राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिली आहे.
या रॅलीमध्ये कोस्टगार्ड, ओएनजीसी, सीमाशुल्क विभाग, पोलीस, नौदल, हवाई दल, तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचा समावेश असणार आहे. रॅलीचा शुभारंभ आज वरळी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयाकडून होणार आहे. रॅली सागरी किनारपट्टीमार्गे गोव्यापर्यंत जाऊन पुन्हा सागरी किनारपट्टीमार्गेच मुंबई येथे परत येऊन दि. 10 जून 2018 रोजी समाप्त होईल. प्रवासादरम्यान रॅलीच्या थांब्याच्या ठिकाणी स्थानिक मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.