१२ प्रवाशांचा कोळसा झाल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाला जाग
यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक येथे भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ४१ जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. या घटनेनेनंतर यवतमाळच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली असून, मोटर वाहन निरीक्षकांनी आज शनिवारी दुपारी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात धडक देत बसेससह कागदपत्रांची तपासणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी प्रवशांमध्ये यवतमाळ येथील सहा प्रवासी, पुसद येथील चार, वाशिम येथील नऊ, डोंबिवली, कसारा, केवड येथील प्रत्येकी एक, मुंबईतील सहा, तर जालना येथील दोन प्रवाशांचा समावेश आहे. स्लीपर कोच असलेल्या या बसमध्ये ३० प्रवाशी क्षमता असताना ५३ प्रवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये कसे आले, याचा तपास आता परिवहन विभागाने सुरू केला आहे. मोटर वाहन निरीक्षकांनी आज चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसेसची तपासणी केली. एसी स्लीपर कोच बसेस प्रवासासाठी योग्य आहेत का? बसची आंतर्बाह्य उंची, लांबी, रुंदी, तसेच दोन बर्थ मधील गँगवे, इमर्जन्सी डोअर व पॉइंटेड हॅम्मर, जीपीएस यंत्रणा, स्पीड गव्हर्नर आदी संपूर्ण बाबी अधिकाऱ्यांनी तपासल्या. दरम्यान, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट देऊन या अपघाताची माहिती घेतली व नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे व नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कसे काय बसवले, याची चौकशी करण्याचे आदेश राठोड यांनी प्रशासनाला दिले.