पश्चिम महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा; पेरण्या खोळंबल्या!
- सांगली जिल्ह्यातील ५२ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या
सांगली |
गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील ५२ टक्के क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सलामीला पावसाने दमदार सुरुवात केल्याने यंदा मृगाच्या मुहूर्तावर पेरण्या आटोपतील असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत असतानाच अखेरच्या चरणात पावसाने दडी मारल्याने मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. मृग नक्षत्राचा प्रारंभ सात जूनला झाला असला तरी तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जिल्हयाच्या दुष्काळी भागात दमदार हजेरी लावल्याने बऱ्याच वर्षांनी या भागात मृग नक्षत्रावर पेरण्याही सुरू झाल्या होत्या. दुष्काळी जत तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने पेरण्यासाठी अनुकूल स्थितीही निर्माण केली. मात्र १९ जूनपासून पावसाने पूर्णत उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्हयात यंदा २ लाख ७७ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्याचे नियोजन होते. गेल्या आठवड्यापर्यत जिल्हयात १ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त पेरण्या जत तालुक्यात २८ हजार १९५ हेक्टर क्षेत्रावर झाल्या आहेत, तर त्याखालोखाल शिराळा तालुक्यात २२ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत त्या क्षेत्रावरील पिके उगवून आली असून तालीच्या आणि कसदार रानात कोळपणीची कामेही चालू झाली असली तरी हलक्या रानातील पिके दुबार धरू लागली आहेत. ज्या क्षेत्रावर आठ दिवसापूर्वी पेरण्या झाल्या आहेत, पावसाने उघडीप दिल्याने त्या रानातील बियाणे साळुंखी, मोर, उंदीर फस्त करीत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात तुटाळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दमदार आणि तालीची राने वगळता अन्य ठिकाणी येत्या चार दिवसात पाऊस झाला नाही तर, दुबार पेरणीचे संकट समोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. तसेच सोयाबीन पिकासाठी उशिराची पेरणी म्हणजे तांबेरा रोगाला आमंत्रण ठरणारे आहे. यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी सध्या आहेत.