पुणे । प्रतिनिधी
चोरांना पकडण्यासाठी, खुन्यांना पकडण्यासाठी शहरभर लावलेले सीसी टीव्ही प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनाच, दुचाकी स्वारांवरच जास्त लक्ष केंद्रित करत असून, त्याद्वारे हेल्मेट सक्ती करून हेल्मेटच्या नावाने पुण्यात करोडो रुपयांची लूट केली जाते आहे. हेल्मेट बाबत ची आपली भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा नेते कृष्णा गायकवाड यांनी केली आहे.
ते म्हणाले,’भाजपाचे राज्यात सरकार असताना राष्ट्रवादी चे अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांच्यासह सर्वांनी हेल्मेट सक्तीला केलेला विरोध , भाजपचे संदीप खर्डेकर, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक आणि शिवसेनेसह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट विरोधी सुरु केलेली चळवळ ‘नाटकी होती काय ?असा प्रश्न विचारला जाऊ शकेल अशी स्थिती आता निर्माण होऊ पाहते आहे. एकीकडे मेट्रो शहरात आणली जात असताना दुसरीकडे १ टक्का मुद्रांक अधिभार मेट्रो साठी दस्तनोंदणीवर तर लावणार आहेतच , पण गेली वर्षाहून अधिक काळ हेल्मेट च्या नावाखाली सीसी टीव्ही ला कार्यरत करून लाखो दुचाकी चालकांना एसएम एस पाठवून लोक अदालतीच्या नोटीसा पाठवून त्यांच्याकडून हजारो रुपयांची दंड वसुली करून सरकारने करोडो रुपये वसुलीचे तंत्र न्यायिक प्राधिकरण यात घेऊन जमा करण्याचे कारस्थान सुरु ठेवलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ,राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी आता तरी तातडीने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे . हेल्मेट सक्ती राज्यात आहेच हे स्पष्ट असून त्यावर नागरिकांना सुट दिलेली नाही . मग आपले कार्यकर्ते जी आंदोलने भाजपा सेना युतीचे सरकार असताना करत होती ते सारे ढोंग होते काय ? असा सवाल देखील गायकवाड यांनी केला आहे .