उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं’
नवी दिल्ली – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं’, असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
मागील काही दिवसांत अशाप्रकारे वादग्रस्त आणि टीका होणारे वक्तव्य करण्याची रावत यांची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी फाटक्या जीन्स (रिप्ट जीन्स) घालणाऱ्या महिलांच्या संस्कारासंदर्भात वक्तव्य केले होते. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर एका ठिकाणी भाषण देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यात भगवान श्री राम आणि श्री कृष्णाप्रमाणे पूजा केली जाईल, असे म्हटले होते. यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी चुकीचा संदर्भ देणारे वक्तव्य करून विरोधकांना टीका करण्याची आयती संधी उपलब्ध करुन दिली आहे.
वाचा :-शोपियांमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
झालं असं की तीरथ सिंह रावत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगाण गाताना म्हणाले, ‘कोरोना कालावधीत भारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झालं असतं कोणीही सांगू शकत नाही. आपली परिस्थिती आतापेक्षा वाईट असती. पंतप्रधान मोदींनी आपल्याला खूप दिलासा देणारे निर्णय घेतले. इतर देशांपेक्षा भारत कोरोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळत आहे. अमेरिका ज्यांनी आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं, ज्यांनी जगावर राज्य केलं ते या कोरोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेत ३.७५ लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये कोरोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाऊन लागू होणार आहे.’
रावत यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ‘भाजपाचा एक नेता आपल्याला शिक्षणाचे महत्त्व किती हे पटवून देताना, असे म्हणत काँग्रेस नेत्यांनी रावत यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे, तर समाजवादी पक्षाचे नेते जुही सिंग यांनी ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं पण कधी?’, असा सवाल उपस्थित केला आहे.