चित्रा वाघ यांचा उर्फी जावेद आणि रूपाली चाकणकर या दोघींना टोला
चित्रपटाचा पेहराव तेव्हढ्यापुरता असतो, लोकांना उत्तेजीत करण्यासाठी नाही
मुंबई : अभिनेत्री- मॉडेल उर्फी जवेदप्रकरण सध्या चांगलच तापलं आहे. चित्रा वाघ यांच्या पोलीस तक्रारीनंतर उर्फीला अंबोली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्या आधी उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करत महिलाआयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. आता पोलिसांनी उर्फीची चैकशी केल्यानंतर महिला आयोगानं उर्फीच्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी उर्फीला सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. महिला आयोगाने उर्फीच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर चित्रा वाघ यांनी दोघींवर निशाणा साधला आहे.
तिने तक्रार कुठं द्यावी आणि कशाला द्यावी? हा तिचा प्रश्न आहे. माझा एकच विषय आहे. बाई कपडे घाल आणि फिर. तिला कोण मारहाण करणार? तिला पाठींबा देणार्यांनी तिला कपडे द्यावेत. चित्रपटाचा पेहराव तेव्हढ्यापुरता असतो. लोकांना उत्तेजीत करण्यासाठी नाही. महिला आयोगाला उत्तर दिलं आहे ते पब्लीश करा आणि लोकांना कळू द्या, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
सोबतच, महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा वाघ यांनी केवळ स्वत: च्या राजकीय फायद्याकरिता किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांद्वारे दिल्या आहेत. चित्रा वाघ यांचे राजकीय व्यक्तित्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती अथवा व्यक्ती समुहाकडून माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे मला घराबाहेर पडतानाही भिती वाटत आहे, म्हणुन प्रकरणाची दाहकता निवळेपर्यंत सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी उर्फी जावेद हिने महिला आयोगाकडे केली आहे.