BMC Election 2026 : ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!

Mahayuti Vs MVA Mumbai Development : मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची आर्थिक नाडी आहे. कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना कवेत घेणाऱ्या या महानगराची ओळख ‘धावणारी मुंबई’ अशी आहे. परंतु, गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते – जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुतीचे सरकार येते, तेव्हा मुंबई धावते; आणि जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी (मविआ) नावाचा प्रयोग होतो, तेव्हा मुंबईच्या विकासाला ‘स्पीडब्रेकर’ लागतो. आज पुन्हा एकदा तीच स्थगिती देणारी प्रवृत्ती मुंबईच्या दारावर उभी आहे.
फडणवीस काळ : मुंबईच्या पायाभूत सुविधांचे सुवर्णयुग
२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईने खऱ्या अर्थाने आधुनिकतेची कास धरली. दशकानुदशके कागदावर असलेले प्रकल्प जमिनीवर उतरले. मुंबई मेट्रोचे जाळे विणणे असो, कोस्टल रोडची आखणी असो किंवा ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) ची पायाभरणी असो; या सर्व कामांना फडणवीसांनी ‘रॉकेट गती’ दिली होती.
हेही वाचा – हकालपट्टी नव्हे, स्वाभिमानाने पक्षत्याग; विरोधकांकडून खोट्या अफवा !

अहंकार आणि स्थगिती : ठाकरेंचा काळा अध्याय
२०१९ मध्ये अनैतिक तडजोड करून सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने विकासाची ही गाडी रुळावरून खाली उतरवली. केवळ देवेंद्र फडणवीस यांचे श्रेय हिरावून घेण्याच्या सूडबुद्धीपोटी मेट्रो-३ चे कारशेड (आरे) रोखून धरण्यात आले. या एका अहंकारी निर्णयामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल १० हजार कोटींनी वाढला आणि मुंबईकरांचा हक्काचा प्रवास चार वर्षे लांबणीवर पडला.
जलयुक्त शिवारपासून ते मेट्रोपर्यंत प्रत्येक लोककल्याणकारी कामाला स्थगिती देणे, हेच मविआ सरकारचे मुख्य धोरण बनले होते. ज्या वेळी सामान्य मुंबईकर खड्डे आणि वाहतूक कोंडीत तासन् तास अडकला होता, तेव्हा ‘मातोश्री’वरून केवळ प्रकल्पांना खो घालण्याचे आदेश सुटत होते.




