‘घरात काम करणाऱ्यांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा’; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिल्याची माहिती आहे. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सुरतमध्ये एक जादू झाली आणि भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. अशा प्रकारची जादू आता होऊ लागली तर सर्वसामान्य लोक काय शिल्लख राहणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे. राज्यात महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील, असे वाटत आहे.
हेही वाचा – ‘निवडणूक आयोगाचा गळा भाजपच्या हाती’; काँग्रेस नेत्याची भाजपवर टीका
मला कळले की, रॉकेट, रणगाडे वैगेरे वैगेरे…काय काय त्यांना देत आहेत. आता घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत. मात्र, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होत आहे. पण इकडे गद्दारांची सुरक्षा केली जात आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच, अशोक चव्हाण भाजपात गेल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.