‘शिवसेनेची स्थापना कमळाबाईला..’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आझ जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांची जळगावमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझा जीव देश आणि जनतेसाठी जळत आहे. देशाला जाग करण्याचं काम वंशपरंपरागत माझ्याकडं आलं आहे. मध्ये मुंबईत ‘इंडिया’ची बैठक पार पडली. यांचं अध्यक्षपद शिवसेनेकडं होतं. बैठक पार पडल्यानंतर गद्दारांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसह बॅनर लावलं. त्यावर ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ असं लिहलं होतं.
२५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेस कदापीही होणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये शिव महापुराण विचारांचा ‘जागर’
राम मंदिराचं येत्या 23 जानेवारीला उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या दिवशीच उद्घाटन होणार आहे. मी त्याचं स्वागत केलं. पण उद्घाटनामागे एक डाव असू शकतो. राम मंदिराच्या उद्घाटनाला लाखो हिंदूंना बोलवायचं. बस, रेल्वे आणि ट्रकने बोलवायचं. आणि परतताना एखादा गोध्रा घडवायचा असं होऊ शकतं. हल्ला घडवू शकतात. कोणत्या तरी वस्तीत बस जाळायची. दगडफेक करायची. माणसं मारतील, पुन्हा देश पेटवतील. घरांच्या होळ्या पेटतील. आणि त्यावर हे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतील. हे डावपेच त्यांचे होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.