‘मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यला मी तयार करने, असा शब्द फडणवीसांनी दिला होता’; उद्धव ठाकरेंचा दावा
मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यला मी तयार करने, असा शब्द फडणवीसांनी दिला होता, असं दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून नव्याने राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सगळं कुठे सुरू झालं? लोकांना हे माहिती आहे. आम्ही हिंदुत्व व राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासोबत होतो. भाजपानं आमच्याबरोबर हे का केलं? माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य बघतो. चांगलं चाललं होतं. माझ्या वडिलांचं २०१२मध्ये निधन झालं, तेव्हा मोदी आमच्या घरी आले होते. २०१४मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं.
अमित शाह पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर मात्र त्यांची चालच बदलली. २०१४च्या निवडणुकीआधी अमित शाहांनी विचारलं तुम्ही सर्व्हे केला आहे का? मी म्हटलं आम्ही लढणारी माणसं आहोत, आम्ही सर्वे करत नाही. शिवाजी महाराजांनी सर्व्हे केला नव्हता. जर सर्वेमध्ये असं दिसलं की तुमचा पराभव होणार आहे, तर तुम्ही लढणंच सोडून देता का? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – ‘निलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे महसूल मंत्र्यांची झोप उडाली’; शरद पवारांचं विधान
सुरुवातीला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असे भाजपाचे नेते आमच्याशी वाटाघाटी करण्यासाठी येत असत. तेव्हा आमच्यात जागांसाठी चढाओढ व्हायची. पण आता त्यांनी उर्मटपणा व आकड्यांचा वापर सुरू केला आहे. त्यांनी राजस्थानमधले भाजपा नेते ओम माथूर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवलं. भाजपाला असं वाटलं की आता बाळासाहेब हयात नाहीत, तर हल्ला करायची हीच वेळ आहे. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे. तेच त्यांनी २०१९मध्ये माझ्याबाबत केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल. अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईल, हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की ते माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील. पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. मला भाजपाचा असा एक मित्रपक्ष सांगा जो आनंदी आहे. आज एनडीएमध्ये फक्त अस्ताव्यस्त झालेले लोक आहेत. ते स्वत:च्या नेत्यांच्या बाबतीतही हेच करतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.