संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी, तृप्ती देसाई आक्रमक
नगर – अभिनेत्री कंगना रानौत हिच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिची माफी मागावी अशी मागणी भूमात ब्रिेगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. अन्यथा केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,’ अशी भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कंगना राणावत प्रकरणावर बोलताना मांडली.
कंगना रानौत यांनी मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
‘कंगना रानौत यांनी मुंबई सुरक्षेबाबत ट्विट केले होते. त्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्या व्यक्त झाल्या. मात्र, त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला. कंगना रानौत यांचे ट्विट चुकीचे होते, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे,’ असे सांगून देसाई पुढे म्हणाल्या, ‘परंतु वारंवार सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेना आमदार त्यांना (कंगना राणावत) रणरागिणींच्या माध्यमातून थोबाड फोडू, अशा धमक्या देतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि माफी मागयाला ते तयार नाहीत. तरी तातडीने संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागितली पाहिजे. कारण अशा पद्धतीचे शब्द वापरणे म्हणजे महिला सन्मानावर आघात करण्यासारखेच आहे. ज्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला जातो, तेथे अशा पद्धतीने एका खासदाराने वक्तव्य करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले. ‘संजय राऊत यांनी पुढे येऊन मोठ्या मनाने कंगना राणावत यांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,’ अशी मागणीही त्यांनी केली.