मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी प्रश्न का नाही सोडवला? उदयनराजेंचा सवाल
मुंबई : मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या निषेधार्थ मोर्चे काढले जात आहेत. मराठा आदोलकांनी थोडा वेळ द्यावा, असं सरकारकडून सांगितलं जात आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी आरक्षण, आंदोलकांची भूमिका आणि सरकारसमोरील अडचणींची माहिती दिली. यावेळी उदयनराजे यांनी मीडियासमोरच हातजोडले. राजकीय पक्षांना कोणतंही राजकारण न करण्याची विनंती केली.
उदयनराजे म्हणाले, कोणत्याही समाजाच्या भावनांशी खेळू नका, ही माझी सर्वांना हातजोडून विनंती आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून यातून मार्ग काढावा, ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कोणीही समर्थन करत नाही. उलट त्याचा निषेधच आहे. ५८ मोर्चे काढल्यानंतर एका छोट्याशा सराटी गावात हे घडलं. हे जर राज्यभर पसरले असते तर काय केले असते? सराटीतील घटनेनंतर हा वनवा राज्यभर पसरला असता तर काय झाले असते? प्रत्येक लोकप्रतिनिधींना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले असते, राजकारण करण्यासाठी नव्हे. आमदार, खासदार म्हणजे लोकशाहीतील राजे असतात. त्यांनी सर्वसामान्य लोकांना वर खेचले नाहीत तर उपयोग काय? असा सवाल उदयनराजे यांनी केला.
हेही वाचा – मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरूच
शरद पवार हे देखील मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून हा प्रश्न का हाताळला गेला नाही? आज आमच्या काळात हा प्रश्न विचारला जातो. पण त्यांनी हा प्रश्न का हाताळा नाही? शरद पवार हे आम्हाला ज्येष्ठ आहेत, वडील आहेत. मी पवारांवर आरोप करत नाही. पण मी मागास कुटुंबातला असतो तर मी विचारणारच की तुम्ही का केले नाही? शरद पवार अपयशी की नाही या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. पण आजपर्यंत जे सत्तेत होते, त्यांना हा प्रश्न का विचारत नाही? असंही उदयनराजे म्हणाले.