परदेशवारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार E-Passport
E-Passport : तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. अनेकदा पासपोर्ट काढण्यात बराच वेळ लागतो, पण आता हा वेळ कमी होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आता नागरिकांना नवीन आणि अपग्रेड ई-पासपोर्ट मिळणार आहेत. भारत सरकार लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा लॉन्च करणार आहे. या पासपोर्ट सेवा कार्यक्रमात नवीन आणि अपग्रेड केलेल्या ई-पासपोर्टचा समावेश होणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त ही घोषणा केली.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले की, याद्वारे लोकांना अतिशय सहज आणि अपग्रेड पासपोर्ट मिळू शकतील. लोकांना वेळेवर, विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देणा, हा आमचा उद्देश आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार आहे. पंतप्रधानांच्या जीवन सुलभतेचा मंत्र पुढे घेऊन आम्ही डिजिटल इको सिस्टीम अधिक चांगली बनवत आहोत. या अंतर्गत ई-पासपोर्ट सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता चालित सेवा वितरण, चिप सक्षम पासपोर्ट वापरून लोक सहज परदेशात प्रवास करू शकतील.
हेही वाचा – गणेशोत्सवाकरीता मध्य रेल्वे चालविणार १५६ गणपती स्पेशल ट्रेन!
या तंत्रज्ञानामुळे डेटाची सुरक्षाही मजबूत होणार आहे, अशी माहितीही जयशंकर यांनी दिली. ई-पासपोर्ट सेवा २.० अंतर्गत नवीनतम बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रगत डेटा विश्लेषण, चॅट बॉट, भाषा प्राधान्यासह क्लाउड कॉम्प्युटिंगचा वापर केला जाईल. यामुळे पासपोर्ट मिळवणे सोपे होईल आणि डेटादेखील सुरक्षित राहील. ई-पासपोर्ट सेवेचे सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि एनआयसीने विकसित केले आहे.