ताज्या घडामोडीमुंबई

गणेशोत्सवासाठीच्या रेल्वेगाड्या फुल्ल, आता विशेष ट्रेनकडे भाविकांचे लक्ष

 मुंबई | प्रतिनिधी

 रस्त्यांवरील खड्डे आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे होणारी प्रचंड वाहतूककोंडी यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वेला प्रथम पसंती असते. म्हणूनच गणेशोत्सवाला चार महिने असताना मुंबई-कोकण मार्गावरील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. ‘कन्फर्म’ तिकीट मिळत नसल्याने आता चाकरमान्यांचे लक्ष रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या घोषणेकडे लागले आहेत.

रस्ते प्रवासाच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान मानला जातो. रेल्वे प्रशासनाकडून चार महिने अर्थात १२० दिवस आधी आरक्षण करण्याची मुभा दिली आहे. यंदा ३१ ऑगस्टला गणेशोत्सव सुरू होणार आहे. उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी कोकणकन्या (मांडवी), दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांसाठी गर्दी केली आहे. या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने आता प्रतीक्षायादी सुरू झाली आहे. चार महिने हा कालावधी मोठा आहे. यात अनेकांचा प्रवास रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतीक्षायादी का असेना तिकीट आरक्षित करण्याकडे प्रवाशांचा कल आहे. परिणामी या प्रमुख गाड्यांच्या प्रतीक्षायादीतदेखील सातत्याने वाढ होत आहे. लवकरच गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनामुळे उत्सवावर प्रचंड निर्बंध येतात. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होण्याची आशा असल्याने भाविक प्रचंड उत्साहात आहेत. बच्चेकंपनीही बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहे. अशातच गणेशोत्सवातील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वेला अग्रक्रम दिला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button