बैल अन् मातीचा वास हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख: दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे
- भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला दिल्या शुभेच्छा
- रामायण मैदानावर गर्दीचा उच्चांक, ‘जय भवानी, जय शिवराय’चा जयघोष
पिंपरी । प्रतिनिधी
भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही त्या शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांनी घरातल्या पोरासारखं गोठ्यातल्या बैलाला जपलं. त्यामुळे बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची, आपल्या शेतकऱ्यांची ओळख आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी जी-जी माणसं राबली. त्या सर्वांना मी मुजरा करतो. कारण, त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांच्या आयुष्यातला पुन्हा आनंद आला. बैलांचा, शेणा-मुताचा अन् मातीचा वास हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख आपल्यापासून वेगळी होवू शकत नाही, अशा भावना प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या.
भारतातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव,चिखली येथील रामायण मैदानावरील बैलगाडा घाटात सुरू आहे. सोमवारी ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’चित्रपटाच्या टीमने घाटात भेट दिली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर, गाडामालक उपस्थित होते.
प्रवीण तरडे म्हणाले की, ‘जय भवानी’ म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडातून आपसूक जय शिवाजी… येतं तो खरा शिवरायांचा मावळा म्हणून ओळखावा. ज्या आठरा पगड जाती-जमातींना सोबत घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभा केले. त्या आठरापगड जाती-जमातींची ओळख जगभरात ‘मराठा’ म्हणून आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपटात मराठा काय असतो? ते दाखवले आहे. फोंड्याच्या लढाईत २०० मराठा हातात नंग्या तलवारी घेवून अडकले होते. त्यावेळी सरसेनापतींनी ‘‘ परिस्थिती जितकी बिकट… मराठा तितकाच तिखट…’’ असा साधलेला संवाद आणि त्यानंतर तब्बल ४ हजार पोर्तुगीज २०० मराठ्यांनी कापून काढले. हा मराठ्यांचा इतिहास आहे, असा रोमहर्षक संदर्भही तरडे यांनी यावेळी सांगितला. तसेच, ‘सरसेनापती हंबीरराव’ केवळ महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण जगभर प्रदर्शित झाला आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सिनेमा म्हणून या चित्रपटाने विक्रम नोंदवला आहे. तो केवळ शेतकरी आणि पैलवानांच्या जीवावरच असेही तरडे म्हणाले.
सरसेनापती हंबीरराव आणि बैलगाडा नातं…
सरसेनापती हंबीरराव आणि बैलगाडाचा संबंध आहे. कारण, हंबीरराव यांची कोपळ आणि कनार्टकातील लढाईशी संबंध आहे. कारण, ३ हजार बैलगाडे पुढे घुसले होते. त्यानंतर मराठा सैन शत्रूवर चालून गेले. आधी घाव बैलांनी अंगावर घेतले, मग मराठ्यांनी लढाई केली. बैलांच्या शेणा-मुताचा वास हीच आपली ओळख आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हा मातीचा वास आमदार महेश लांडगे यांनी जपण्यासाठी पुढाकार घेतला, अशा शब्दांत कौतुकही प्रवीण तरडे यांनी केले.
बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढणार…
बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा थरार पहायचा असेल, तर घाटात आले पाहिजे . गावांत, खेड्यापाड्यांत आनंद शोधणाऱ्या माणसांचा हा खेळ आहे. जगातील सर्वात वेगवान धावपटू ‘हुसैन बोल्ट’ धावताना जसे प्रेक्षकांचे लक्ष असते, तसे आपल्या शेतकऱ्यांचे बैलगाडा शर्यतीकडे लक्ष असते. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट निघाला तर तो भारतातील सर्वांत थरारक चित्रपट असेल. असा सिनेमा मी दिग्दर्शीत केला, तर बैलांच्या पायातसुद्धा कॅमेरा बसवून बैलं पळवणार आहे. चित्रपट काढला, तर तो माझ्या लोकांसाठी असेल, असेही दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.
प्रवीण तरडे आणि टीमने धरला हलगीवर ठेका…
मराठमोठ्या पद्धतीने अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता रमेश परदेसी, अभिनेता शुभंकर एकबोटे, अभिनेता सुनील अभ्यंकर, अभिनेता देवेंद्र गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी घाटातून येत असताना दिमाखात एन्ट्री करण्यात आली. हलगी आणि ताशांच्या गजरात तरडे यांनी ठेका धरला. आमदार महेश लांडगे आणि टीमने केलेल्या स्वागतामुळे प्रवीण तरडे भारावून गेले.