“….हे खेळाडूंच्या भविष्याचाच ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
नवी दिल्ली |
राज्यातील क्रीडा संकुलांची देखभाल नीट करण्याची गरज असताना महाविकास आघाडीमधले नेते व मंत्री रेस ट्रॅकवर गाड्या उभ्या करून खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत, त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यावरुन मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्यासंदर्भात दरेकर म्हणाले की, राज्यात आधीपासूनच क्रीडा सुविधा कमी आहेत. त्यामुळे त्या ट्रॅकची नासधूस करू नये. रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणताना काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्या ट्रॅकवर स्पर्धक ऑलिंपिकसाठी सराव करतात, स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवत असतात. महाविकास आघाडी सरकारकडून एक दीड वर्षात खेळांना चालना देण्यात आली नाही. ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तूचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे या कृतीचा मी निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.
पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या मुख्य स्टेडियममध्ये अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. मात्र, तरीही गाड्या ट्रॅकवर नेण्यात आल्याचं बोललं जात आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. स्टेडियमच्या कडेला असलेल्या दोन मजली इमारतीमध्ये स्पर्धेच्या काळात वापरण्यासाठीची दालने आहेत. पण त्यांचा क्रीडा संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ताबा घेत तेथे आलिशान कार्यालये थाटली आहेत. मुख्य इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी लिफ्ट आहेत. तर स्टेडियमची रचना अशी आहे, की अॅथलेटिक्सची धावपट्टी दुसऱ्या मजल्याला समांतर आहे. मंत्र्यांना लिफ्टने जाण्याचा त्रास नको म्हणून या धावपट्टीवर गाड्या आणून, त्यांना विनासायास बैठक कक्षात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असं बोललं जात आहे. इतकंच नाही, तर सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती.