मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही – नाना पटोले
मुंबई – मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान करून चर्चेत आलेल्या नाना पटोले यांनी आता पुन्हा एकदा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एक ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहेत. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री?”
दरम्यान, यावेळी नाना पटोले यांना पाच वर्ष मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले यांनी पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.
शरद पवार यांनी आपले मत सांगितले, तसं मी माझ्या पक्षाचे मत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे, ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.