सत्तेतील मराठी मंत्री दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत- संजय राऊत
मुंबई |
“एक काळ असा होता दिल्लीतील आपले जे मराठी मंत्री, नेते होते. ते कोणत्याही पक्षाचे असो, पण महाराष्ट्राचा जर विषय आला की हे सगळी लोकं एकत्र यायचे आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहिले आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. पण आता चित्र नेमकं उलटं आहे. आता सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. जगाच्या इतिहासात असं मी कधी पाहिलं नव्हतं, की आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची. हे कोणतं राजकारण सुरू आहे?” असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा भासत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्यावर एबीपी माझाशी बोलतान संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, “लस ही माणसाला या क्षणी जीवनावश्यक गोष्ट आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणातात, लस उत्सव साजरा करा. जागृती होण्यासाठी आणि महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, का? तर इथे भाजपाचं राज्य नाही. इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारण म्हणतात. उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त लसीचा पुरवठा केला गेला आहे. गुजरातमध्ये तर करोनाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत की महाराष्ट्र मॉडेल राबवा. महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्या कमी असूनही त्यांना १ कोटी लसी देण्यात आल्या आहेत आणि महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींची आवश्यकता असताना, आठ लाख लसींचाही पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली जात आहेत.”
वाचा- “सर्वच परीक्षा पुढे ढकला”, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी