घातपाती कट रचल्याप्रकरणी दाऊदसह ६ जणांवर एनआयएने गुन्हे नोंदवले
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार दाऊद आणि त्याच्या ६ साथीदारांविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच एनआयएकडे सोपवला आहे. त्यानुसार एनआयएने दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह त्याच्या टोळीतील ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
भारतात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी आणि घातपाती कट रचल्याप्रकरणी दाऊद आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध यूपीएखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आता केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे. त्यानुसार दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि त्याच्या अन्य साथीदारांविरोधात एनआयएने गुन्हे नोंदवले आहेत. अंमली पदार्थाची तस्करी, बनावट नोटा, हवाला आदी प्रकरणांत दाऊद टोळीचे गुंड गुंतले आहेत. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जागतिक दहशतवाद विरोधी संमेलन २०२२ मध्ये बोलताना भारताचे प्रतिनिधी टी. एस. तिरुमुर्ती यांनी दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांना ओळखून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये दडून बसला असल्याची माहिती आहे. १९९३ मध्ये त्याने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले. त्यानंतर भारताने दाऊदला मोस्ट वाँटेड फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले. १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत १३ बॉम्बस्फोट झाले. त्यात २५७ जण ठार झाले होते, तर ७१३ पेक्षा अधिक जखमी झाले होते.