महापुराने भाज्यांचे दर घसरले, 100 गाड्या शेतमाल पडून
मुंबई- राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा फटका मुंबई बाजार समितीमध्ये येणार्या भाजीपाल्याला देखील बसला आहे. भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांअभावी भाजीपाला खराब होत चालला आहे. बाजारसमितीत 100 गाड्या शेतमाल मोठ्या प्रमाणावर पडून आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये 650 गाडी आवक झाली. ग्राहक नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी जोरदार पावसामुळे बाजारात आवक झालेला शेतमाल पूर्णपणे भिजून मार्केटमध्ये आला आहे. त्यामुळे अनेक व्यापार्यांनी भाजीपाला अंथरून सुकण्यासाठी ठेवला होता. मात्र, ग्राहक नसल्याने प्रमाणापेक्षा अधिक 100 गाड्यांचा शेतमाल पडून राहिला आहे.
खूपच भिजेलेला माल सडू लागल्याने फेकून देण्याची परिस्थिती बाजार परिसरात दिसत आहे. त्यामुळे ग्राहक या भाज्यांची खरेदी करत नसल्याने भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून प्रत्येक भाजी 20 रुपये किलोच्या खाली विकली जात आहे. शिमला मिरची 4 ते 5 रुपये किलो, फ्लॉवर 5 ते 6 रुपये, कोबी 9 ते 10 रुपये, वांगी 5 ते 7 रुपये, काकडी 10 रुपये, टोमॅटो 20 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबिरी 8 रुपये, मेथी 8 , पालक 5 व पुदिना 3 रुपये जुडी विकली जात असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.