वडिलांना पास झाल्याचे कळवले, परंतु नापास झाल्याच्या विवंचनेतून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांने घेतला गळफास
नागपूर : अभियांत्रिकीच्या पहिल्याच वर्षात नापास झालेल्या मुलाने वडिलांचे मन दुखावू नये म्हणून पास झाल्याचे सांगितले. परंतु, वडील नागपुरात येणार असल्याने त्याचे बिंग फुटणार होते. त्यापूर्वीच मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ‘एमआयडीसी’त सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अनुराग गजानन पनपालिया (१९) रा. धामणगाव, अमरावती असे मृताचे नाव आहे.
अनुराग हा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. वानाडोंगरीतील मातोश्री नगरात पोलीस कर्मचारी प्रकाश पाटील यांच्या घरी तो प्रथमेश नक्षणे याच्यासह भाड्याने राहायचा. मृत्यूनंतर अनुरागची गुणपत्रिका सापडली. अभियांत्रिकीमध्ये तो ३ विषयात नापास झाला होता. मात्र, वडिलांना त्याने पास झाल्याचे कळवले होते. या विवंचनेतून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.